शिवसेनेचे ‘राम’कारण आणि विरोधकांचे राजकारण

Foto

औरंगाबाद - अयोध्या येथे राम मंदिर उभारणीस विलंब होत आहे. तसेच सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सत्ता आल्यास मंदिर उभारू असे आश्‍वासन दिले होते. पण सत्तेत येऊन साडेचार वर्षे उलटले तरी मंदिर उभारणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेने झोपी गेलेल्या भाजपला जागे करून आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला. या दौर्‍याने मंदिर उभारणीच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी शिवसेनेने मंदिराचा मुद्दा पुढे केल्याची टिका विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर मित्र पक्ष असलेल्या भाजपने मात्र सावध  प्रतिक्रिया दिली आहे.

 

शिवसेनेने दसरा मेळाव्यात राममंदिराचा प्रश्‍न उपस्थित करून सत्ताधारी भाजपवर मंदिर उभारणीत होत असलेल्या विलंबावरुन जोरदार टिका केली होती. राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपने सत्ता मिळविली. पण सत्ता मिळाल्यानंतर या प्रश्‍नाचा विसर पडला. त्यामुळे झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्येला जावून आले. त्यांचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाने ही त्याच दिवशी कार्यक्रम जाहीर करून शिवसेनेचा कार्यक्रम अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सह कुटुंब शिवसैनिकांसह अयोध्येत गेले. ठाकरे यांच्या या दौर्‍याबाबत देशभरातील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. ठाकरे यांनी या दौर्‍यादरम्यान   सत्ताधारी भाजपवरच निशाणा साधत टिका केली आणि मंदिर कधी उभारणार याची तारीख जाहीर करा. विशेष कायदा करा, काय करायचे ते करा, पण मंदिर उभारा, नसता सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्टपणे बजावले. आगामी वर्षांत ‘मंदिर नाही तर सरकार नाही’ असा इशाराही ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे मंदिर उभारणीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकारवर संघ परिवार आणि अन्य संघटनांकडून दबाव वाढत आहे. त्यामुळे आता सरकार कायदा करून मंदिराचा प्रश्‍न मार्गी लावते का? याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. 

 

विरोधकांकडून टिका; भाजपची सावध प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाच्या गणितासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला असल्याची टिका काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि अर्थमंत्री, महसूलमंत्री व अन्य नेत्यांनी सावध प्रतिक्रिया देत शुभेच्छांसह ठाकरे यांना श्रीराम प्रसन्‍न होईल, अशी सावध प्रतिक्रिया दिली.  

 

उत्तर प्रदेश सरकारकडून कोंडी 

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या सरकारने  सुरक्षेच्या नावाखाली शिवसेनेला जाहीर कार्यक्रमाला परवानगी नाकारली तसेच महाराष्ट्रातून अयोध्येत रेल्वेने गेलेल्या शिवसैनिकांची अडवणूक केली. विशेष रेल्वे बुक करून सेनेतर्फे रेल्वे प्रशासनाला वेळापत्रकही दिले होते. पण सेनेचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये,यासाठी परतीच्या प्रवासाची वेळ एक दिवस अगोदर करून, शिवसेनेची अडवणूक केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. तसेच हे ठरवून झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.